माझी स्नेह्संमेलनाची आठवण
स्नेह्संमेलनाची आठवण
“अरे बाळा तुला नाचायला आवडते ना ? तर मग मी तुला
वर्गात नाचायला शिकवतो आणि तुझी बहिण मनुताई नव्हती नाचली का मागच्या वर्षी
स्टेजवर ! हं,तर तुला मी तसचं नाचायला देईन”
असं म्हणून मी माझ्या पहिलीच्या वर्गातील अनेक मुलांना सुरवातीलाच वर्गात
कायम बसायला प्रवृत्त करायचो आणि मग माझ्या बहुवर्ग अध्यापनातील याच खोलीमध्ये
बसलेला दुसरा वर्ग मोठ्या आशेनं “यावर्षीसुद्धा स्नेहसंमेलन होणार न सर !” असं
म्हणून त्यांच्या चेहऱ्यावरील कमालीचा आनंद व्यक्त करायचा. याचा अर्थ स्नेहसंमेलन
म्हणजे मुलांना आपल्यातील विविध कलागुणांना व्यक्त करण्याची संधी. प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये कोणतातरी कलागुण असल्याची जाणीव मला माझ्या सेवेच्या
काळात कळाली आणि मग अशी विद्यार्थी विकासाची हि संधी मी कधीच सोडू इच्छिली नाही. यातून दरवर्षी शाळेमध्ये वार्षिक
स्नेहसंमेलन आयोजित केले जायचे .
आमच्या शाळेतील स्नेहसंमेलनाची डंका निदान एक
महिना अगोदरच वाजायची आणि हो मुलांनी तर त्यासाठी मात्र अगदी शाळा सुरु झाल्यापासूनच तयारीला
लागल्याचं दृष्टीस पडायचं. स्नेहसंमेलनाची नोटीस म्हणजे शाळेतल्या
मुलांना उन्हाळ्यातली गारीगार खाल्ल्यागत आनंद व्हायचा. सुरवात आम्हा शिक्षकांची
आणि शाळा व्यवस्थापन समितीची लगेच संयुक्त बैठक व्हायची आणि या बैठकीत खर्चाचे
नियोजन करून आम्हा सर्व शिक्षकांवर जबाबदारी सोपवली जायची. अगोदरचे नियोजन म्हणजे
एका शिक्षकाने विद्यार्थ्यांची त्यांना आवडणाऱ्या कलेची तोंडी किंवा लेखी चाचणी घेऊन त्यामधून कोणत्या विद्यार्थ्याला
कशात भाग घ्यायला आवडेल हे ठरविणे. या चाचणीतून त्यांनी नृत्य, नाटक, मुकाभिनय,
गायन,वादन, भाषण, मनोरे,संचालन असे पैलू निवडायचे. ज्या विद्यार्थ्याना काहीच आवडत
नसेल तर त्यांना आग्रहाने एखादा घटक निवडायला सांगुन त्याची तय्यारी करण्याची
जबाबदारी घ्यायची. प्रमख पाहुणे ठरविणे, बाईंनी स्वागत गीत तयारी करून घेणे. कुणी
नाटिका तालीम घेणे, रंगमंच जबबदारी, स्वयंसेवक नेमणे, गाणे पेन ड्राईव्ह मध्ये
भरणे, वेशभूषा ठरवून उपलब्ध करणे, स्वागतासाठी नवीन रोपटे बनविणे किंवा विकत
आणणे,लेझीम पथक सराव, मनोरे बसविणे,सूत्र संचालन ठरून देणे,रंगमंच आणि सजावट
ठरविणे,फोटोग्राफी आणि शूटिंग व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था,आर्थिक
निओजन आणि व्यवस्थापन करणे, शेवटी चार पाच दिवसाअगोदर सराव आणि रंगीत तालीम घेणे
असा नियोजनबद्ध कार्यक्रम आखला जायचा.,दोन दिवस चालणाऱ्या स्नेह संमेलन या
कार्यक्रमाचे नियोजन पुधिल्प्रमाअने केले जायचे.
दिवस पहिला-
स्नेहसंमेलन
कार्यक्रमात पहिल्या दिवशी लेझीम पथकाने
सन्मानपूर्वक आणलेल्या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते यावेळी आवर्जून ठेवलेले रांगोळी
प्रदर्शनाचे उद्घाटन करून गावकऱ्यांसाठी खुले करून दिले जायचे. चित्रकला , हस्तकला
प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा याच दिवशी मान्यवरांच्या हस्ते करून घ्यायचा आणि पूर्ण वर्षभरात घेतलेल्या विविध स्पर्धा,
मैदानी खेळ, आणि इतर उपक्रम यामध्ये प्रविण्याने विजयी झालेल्या मुलांचा सत्कार
करून घेऊन त्यांना अभ्यासोपयोगी वस्तू बक्षिस म्हणून द्यायच्या.
दिवस दुसरा-
सर्व
विद्यार्थ्यांनी आज स्टेजवर सादर करावयाच्या इव्हेन्टची पूर्ण पूर्वतयारी करून आपापला सरांनी किरायाने आणलेला पोशाख
अगोदरच्या दिवशी मिळाल्याप्रमाणे आपली वेशभूषा करून वेळेवर सजावट वर्गात तय्यार
रहायचे. या सजावट खोलीमध्ये नियोजित शिक्षक किंवा स्वयंसेवक नेमलेला असेल,तिथे
त्या स्वयंसेवकाने पिण्याचे पाणी, आरसा, कंगवा, मेकअप चे सामान अगोदरच नेऊन
ठेवलेले असायचे. या दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमासाठी सुद्धा प्रमुख अतिथी बोलावले
जायचे; ज्यामध्ये प्रामुख्याने कला , बाल साहित्यिक किंवा शिक्षण विभागातील प्रमुख
असायचे. सोबतच शाळेचा एखादा माजी विद्यार्थी जो फौजी ,डॉक्टर, शिक्षक , समाजसेवक
किंवा विशेष कार्यात असेल असा विद्यार्थी असायचा. नियोजित विद्यार्थी आपल्या लेझीम
पथकासोबत पाहुण्यांचे स्वागत करून त्यांना रंगमंचाकडे आणतील आणि मग दुसरे शिक्षक
पाहुण्यांना स्थानापन्न करून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतील असे आमचे नियोजन
असायचे. यासाठी विद्यार्थ्यांनी गायलेल्या स्वागतगीतानंतर अगोदरच तयार करून ठेवलेले झाडाचे रोपटे आणि शाल
पाहुण्यांना स्वागतपर दिली जायची. यावेळी पाहुन्यांनी गावकरी आणि प्रेक्षक यांना
मार्गदर्शन करून औपचारिक उद्घाटन कार्यक्रम व्हायचा आणि पाहुणे त्यांच्यासाठी
असलेल्या विशेष आसनांवर स्थानापन्न व्हायचे. यानंतर बालचमुंचा “किलबिलाट” हा कार्यक्रम
सुरु व्हायचा. या कार्यक्रमामचे सूत्रसंचालन अगोदर नियोजित केलेला एक विद्यार्थी आणि
एक विद्यार्थींनी अगदी हुबेहूब जोडीजोडीने विनोदी संवादातून विशिष्ट संदेश देऊन करायाचे
आणि मग यांनाच कुणाची नजर लागेल कि काय
असे आम्हाला वाटायचे. यावेळी विद्यार्थी
प्रार्थना, भक्तिगीते, पारंपारिक लोकगीते यांचे उत्कृष्ट सादरीकरण करायचे. प्रबोधनपर
विविध एकांकिका यावेळी विद्यार्थी सादर करायचे. यामध्ये शिक्षण, स्त्रीभूर्णहत्त्या,
हुंडाबळी, व्यसनमुक्ती, वृक्षलागवड आणि पर्यावरण , देशभक्ती, एकात्मता ,समाजातील
अनिष्ट प्रथा अश्या विविध ज्वलंत घटकांवर बसवलेले नाट्य आसायचे. अश्या नाटिका बघून
प्रेक्षकांना खदखदून हसतांना आणि कधी कधी हुंदके भरून अश्रू गाळताना नजरेत भरायचे.
आपसूकच अनेकांचे हात खिशात जायचे आणि या लेकरांच्या कलेसाठी मदत जाहीर व्हायची
यातून शाळेसाठी काहीतरी पयोगी वस्तू खरेदी केली जायची.
तब्बल तीन चार तास चालणाऱ्या या कार्यक्रमाचा शेवट
देशभक्तीपर ड्रामा घेऊन आणि शेवटी “वंदे मातरम्” करून केला जायचा; ज्यामुळे
देशभक्तीचे वातावरण तयार व्हायचे. असा हा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम आम्हाला
आणि विद्यार्थ्यांना खूप काही शिकवून जायचा आणि आता पुढील वर्षी हा कार्यक्रम केंव्हा
येईल? अशीच ओढ लागलेली असायची....
लेखन- ज्ञानेश्वर गणपत झगरे
स.शिक्षक जि.प.प्रा.शाळा उमरखेडा, ता-भोकरदन, जि-जालना
मो.नं.-९९२३५२८४९४.

No comments:
Post a Comment