About Me

My photo
मी एक शिक्षक असून कीर्तन करणे आणि संतविचार समाजात रुजविणे हा माझा प्रयत्न. कथाकथन करण्याची आवड असून लिखाणाची आवड आहे.

Sunday, October 20, 2019

मयूरचा नवोदयचा निकाल लागला तेव्हा....!

        संध्याकाळी जेवण करून झोपलो, थोडीफार डुलकी लागली न लागली तोच मोबाईलची रिंग  वाजली, कंटाळा आला होता ;पण रात्रीच्या वेळेला कॉल आला म्हणून पहिला,माझ्या एका शिक्षक मित्राचा फोन आला होता,
"अरे बघितली का पी डी एफ ?"
 "कसली?"
 "अरे लागली की नवोदय ची मेरिट लिस्ट,टाकली तुझ्या व्हाट्सएपला...बघ कोणी आहे का तुझा विद्यार्थी?'
असं ऐकतंच मित्राचा फोन काटला, अन लगेच व्हाट्सएप उघडून फाईल डाउनलोड करायला लागलो. मी रहायला शाळेच्या मुख्यालयीच होतो, खेडं गाव घाणखेडा,, तिथं काही फारसं नेटवर्क नव्हतं... पण आता फाईल डाउनलोड होउस्तवर मला चैन पडत नव्हती. यापूर्वी मागील दोन वर्षांपासून अशीच मोठ्या हौसेन मेरिट निवड लिस्ट पहायची सवय झाली होती. यावर्षी मात्र विद्यार्थी तय्यारी गेल्या दोन वर्षांपासून जरा जास्तच झाली होती अन सरावात मुलांना चांगले मार्क्स मिळत होते, त्यामुळे लिस्ट वाचून पाहतांना हृदयात धडधड वाढत होतं. बाकीच्या लोकांना फक्त त्यांच्या 10, 12 वि, जास्तीतजास्त नोकरीच्या परीक्षेची यादी पाहताना छातीत धडधड होत असेल पण शिक्षकांना मात्र 'रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग'या संतोक्ती प्रमाणे,नेहमीच आमचा निकालाशी संबंध असतो. नवोदय प्रवेश परीक्षेची यादी पाहतांना सर्व यादीवर किती लवकर नजर फिरून आपल्या शाळेतील एखादा विद्यार्थी कधी यामध्ये दिसतो अशी शिगेला पोहोचलेली उत्कंठा यापूर्वी दोन वर्षे मातीत मिसळलेली होती पण यावेळी तरी आपल्या प्रयत्नाला यश येईल अशी आशा होती,अन त्यामुळे सर्वांगाचे बळ नेत्रात घेऊन यादी वाचत होतो तोच  'नम्रता' असे नाव मोठ्या अपेक्षेने पटकन वाचले डोळ्यात आनंद यावा अन लगेच ती आपली नम्रता नसुन दुसऱ्या शाळेची आहे हे समोरचं वाचल्यावर कळालं अन भ्रमनिरास.. कारण नम्रता शाळेत घेतलेल्या सराव परीक्षेत प्रथमच यायची...आता कोणाचे नाव येईल??थोडं अशक्यच वाटत होतं तोच माझी नजर एका नावावर येऊन थांबली!!!!ते नाव होतं मयूर चं.... पटकन वेळ न दवडता सगळंच नाव वाचलं अन मग काय आनंद गगनात मावेना!!! माझा विद्यार्थी 'मयूर एलदोडे' या यादीत आला होता....सरसर यादी वाचली..... "माझा विद्यार्थी मयूर नवोदय ला लागलाय !!!!" असं मोठ्या आवजात स्वतःशीच मोठया मोठयाने म्हणू लागलो... माझ्या आवाजाने माझी पत्नी उठली ,"काय झालं हो??" अगं तो मयूर नाही का ???तो नवोदय विद्यालयाला पात्र झाला, कल्याण झालं बिचाऱ्याच... पोरगं गरीब घरचं पण खूप हुश्शार.... नाव कमावलं स्वतः च अन आपल्या शाळेचं सुद्धा!!असं म्हणत म्हणत मी अंगात कपडे चढवले. "अहो कुठं निघालात आत्ता?? रात्रीचे 11 वाजायला लागले न एवढ्या रात्री कुठं?" "फोन लावा की मयूर च्या घरी..." पण मयूर च्या तेव्हा फोनच नव्हता.  एवढी आनंदाची बातमी स्वतः त्याच्या घरी जाऊनच सांगावी या बेतान घर उघडून बाहेर पडलो होतो पण खालतल्या आळीत एवढया रात्री जरा आवघडचं होतं, अन वरून तिकडच्या वाड्यात डेंजर कुत्रे पण असतात हे मला माहीतच असल्याने  आणि आता सगळाच गाव झोपला आहे, येवढ्या रात्री तिकडे जाणे योग्य नाही हे माझ्या  लक्षात आल्याने  अगदी जड पावलान मी पुनः घरात आलो ..
                                      'माझा विद्यार्थी मयूर नवोदय ला प्रवेशित होतोय 'या आनंदाच्या बातमीनं मी पार फुललो होतो. माझ्या पत्नीनं याचं वेळी एवढ्या प्रसंगी मला अत्यानंद झाल्याचे पाहून  आनंदानं चहा बनवला, दोघंही खुश होतो.  "आता मयूर कुठं जाईल शिकायला ?कितवीपर्यंत शिक्षण होईल?कसं, काय,कुठं? असे तिच्या मनात असलेले बरेच प्रश्न ती मला विचारायची अन मी तिला उत्तर द्यायचो...  असं बराच वेळ चालू होतं. आता बोलता बोलता बरीच रात्र होऊन गेली होती.  बोलत बोलतच  माझ्या पत्नीला झोप लागली होती... मी मात्र माझा पहिलाच विद्यार्थी नवोदय ला पात्र झाल्याने जाम खुश झालो होतो! माझ्या मेहनतीला फळ आलं होतं. यावेळी मला माझ्या बालपणी  माझ्या मनात असलेलं नवोदय आठवत होतं. विविध स्वप्न माझ्या जागत्या डोळ्यासमोर दिसत होती. एक शिक्षक म्हणून माझा आनंद अवर्णनीय होता.
                                          विद्यार्थ्यांना कसं शिकवलं? कशी तय्यारी केली ? आम्ही सर्व शिक्षकांनी केलेले प्रयत्न अन् मयूरचे मार्क...हे सगळं आठवत होत आणि आता त्याची पुढची व्यवस्था... त्याचा आणि पर्यायाने आपला सन्मान ...सगळं मी अनुभवत होतो... झोप मात्र आज माझ्याजवळून पार दूर निघून गेली होती... पुन्हा पुन्हा मोबाईलवर  यादी वाचून पाहणं अन मयूर च्या नावावर येऊन थांबणं.... असं कितीतरी वेळा झालं होतं.
 आनंद हा दिल्याने वाढतो म्हणतात... कोणाला तरी काळवावं या आशेने कुणी रात्री घराबाहेर येईल अशी वाट पाहत होतो...तेव्हड्यात आमचे शेजारी आप्पा  त्यांचा घराचा  दरवाजा उघडून बाहेर आले न आले तोच मी पण बाहेर आलो अन ही आनंदाची बातमी त्यांना सांगितली. अप्पा दोन मिनिटं बोलले त्यांना याविषयी फार कळत नव्हत , उगीच काहीतरी बोलले आणि "गुरुजी एवढी रात्र तरी तुम्ही जागीच आहेत का हे संगायासाठी ! सकाळी सांगा त्यांना ,झोपा आता." असं म्हणून आप्पा पुन्हा घरात गेले.. आता घड्याळात अगदी राम प्रहरीचे चार वाजले होते. कोंबड्यांच्या आरवन्याचा आवाज माझ्या कानावर आला. 'यशस्वी होणाऱ्या सर्वांनाच सकाळी  कोंबड आरवन्याच्या याच वेळी उठावं लागतं' हे माझ्या बाबांनी माझ्या लहानपणी सांगितलेलं वाक्य आठवलं .
 'खेड्यातील माणसं लवकर झोपतात आणि लवकर उठतात'. अगदी पाच वाजेच्या वेळेला शेणपाणी करण्यासाठी , दूध काढण्यासाठी जाणारी, महादेवाच्या मेळात पूजेसाठी जाणारी  मानसं  आता मला रस्त्यावर दिसू लागली होती; तरी पण या बौद्ध वाड्याच्या गल्लीत एवढ्या सकाळी जाण्याची हिम्मत होत नव्हती. चांगली बातमी द्यायची आहे मयूर च्या घरी , मयूर च्या घरचे उठेपर्यन्त आपण अंघोळ करावी असा विचार करून मी स्वतः पाणी तापवून अंघोळ केली, तोपर्यंत आता बाहेर बरंच उजाडलं होतं..
                                 अतिशय आनंदात मी मयूरचा निकाल आणि माझा अभिमान सांगायला आता येलदोड्याच्या  वाड्याकड निघालो होतो. रस्त्यात काही माणसांनी मला मुद्दाम यावेळी "गुरुजी इकडं कुठ?" असं हाटकलं होतं.
                                  अगदी सकाळीच रामपाहार्‍यात भुंकणाऱ्या कुत्र्यांना सावरत मी मयुर च्या दारी आलो, मोठ्या हिंमतीने दरवाजा वाजवला.."कोण हे....?" आजोबाचा आवाज आला, कदाचित ते जागीच असल्याचे मला कळाले. ....
"मी झगरे गुरुजी आहे! उघडा दरवाजा!" अस मी फर्मावलं.
"अरे बापा ,गुरुजी  !! एवढ्या सकाळी!" मुरलीधर बाबाने दरवाजा उघडला.
"गुरुजी, एवढ्या सकाळीच कसकाय???"
 "अहो आलो तुम्हाला आनंदाची बातमी सांगायला!"
"कोणती बातमी ?"
बाबानां  मोठ्या उत्सुकतेन माझ्याकड पाहून विचारलं .
"मयूरला  उठवा, त्याचा नवोदय चा निकाल आलाय,, तो चांगल्या मार्कांन पास झालाय अन त्याचा आता अंबा परतूर ला नंबर लागलाय" मी मोठ्या आवेशान सांगितलं
 "अरेबापरे!!! अगं  ये....! ऐकलं का.....???? ऊठ , हे गुरुजी आलेत... मयुर ला उठावं, पोराचा नंबर लागला म्हणतेत सर परतूर लं!!" आजोबा क्षीण असलेल्या देहातून फार मोठा आवाज काढत म्हणाले आणि त्यांचा आवज ऐकून वाड्यातली बरीच माणसं आता  माझ्याकडं आली होती....
                                     या चर्चेन  मयूर ला पण जाग आला होती.पारस्या तोंडानं तो माझ्याकडे आला न मी अगदीच त्याला जवळ उचलून घेतलं. " अरे वा मयुर! अभिनंदन!! तू नाव कमवलंस !!"  तोपर्यंत मयुर च्या आजीनं चहा ठेवला होता. ..आता माझं पोरगं दूर शिकायला जाईन अन साहेब होईल! या आशेने मयूर च्या आईला  आनंदाचं रडू होतं.. गाईनं वासराला जवळ घावं तस त्या काबाडकष्ट करणाऱ्या गरीब मायणं आपल्या हुशार लेकराला कुशीत घेतलं होतं
 "माझा मय्या साहेब होईल का सर आता?" असा फारसं काही नवोदय विषयी न समजणाऱ्या मयूर च्या आजीने मला विचारलं.
""हं.. नक्कीच आपला मयूर हुश्शार आहे. तो साहेबच होणार." असं मी उत्तरलो.
आता याला कुठं शिकावं लागल? त्याची जेवणाची सोय कशी असेल? याला कोण सोबती मिळेल? असे अनेक शंकेचे आणि उत्सुकतेचे स्वप्न मला गर्दीतील मानसं विचारत होती अन् मी त्यांना मोठ्या अभिमानाने उत्तरे देत होतो. तेवढ्यात चहा तय्यार झाला होता. "अरे चहा द्या गुरुजींना, आणि आणखी मानसं आलीत त्यांना पण वाढवा." असं मयूर चे पप्पा बोलले . जवळ गोळा झालेल्या लहानग्यांना मयूर साखर वाटायला लागला होता.  दीक्षा नावाची त्याची बहिण तो मला सोडून परतूर ला शिकायला जाणार.. तिथे दादा एकटा कसा राहील? या प्रश्नाने रडायला लागली होती. आई तिला समजावत 'बेटा तुला पण असाच अभ्यास करून दादाकडच शिकायला जायचं आहे'असं  म्हणून तिची समजूत काढत होती. हि सामन्यातली असामान्य आई आपल्या मुलाला यशस्वी करण्यासाठी कसं विचार आणि जिद्दीचे खतपाणी घालते ' हे पाहून मी सुद्धा प्रभावित झालो होतो.
                                  गरीबाची झोपडी, त्यामध्ये राहणारं गरीब कुटुंब, कदाचित खाण्यापिण्याची अडचण असेल पण बाबासाहेबांचा मोठा फोटो, त्यासमोर पुस्तकांचा मोठा गठ्ठा.... बाबासाहेबांचा फोटो घरात लावून त्यांच्या फोटोसमोर अभ्यास करणाऱ्या मयूरन हे यश प्राप्त केलं होतं. मागास प्रवर्गातील असून सुद्धा मयूर चा खुल्या प्रवर्गात नंम्बर लागला होता. आमच्या शाळेतून अन गावातून नवोदय ला प्रवेशित होणार मयूर हा पहिलाच मुलगा होता. माझे सहकारी मित्र खरे सर , मुख्याध्यापक शेवाळे सर आणि मी अगदी पाहिल्यावर्गापासून या शाळेसाठी आणि मयूरसाठी केलेल्या कष्टांच आज फळ हातात आलं होतं .
                                  मयूर ला बाजूला करून त्याचे आई बाबा माझ्या जवळ आले अन् पाणावलेल्या डोळ्यांनी माझ्याकडं बघून म्हणाले,"गुरुजी किती आनंदाची बातमी दिली आम्हाला! खरंच आम्ही काय करू शकतो तुमच्यासाठी! आज एवढ्या सकाळी तुम्ही आम्हाला इतकं आनंदी केलंय की आम्ही हा दिवस कधीच विसरू शकणार नाही!"
                                   बघता बघता बरीच वाड्यातली माणसं गोळा झाली होती, मयूरचं आणि आमच्या शाळेत त्यांच्या तोंडून चाललेलं कौतुक ऐकून मला मात्र कृत्य कृत्य झाल्याचं वाटत होतं...!
x

Friday, October 18, 2019

वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने..

.(पार्श्वभूमीवर प्रकशित)
      १५ ऑक्टोबर हा माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिन. या महामानवाने आपल्या आयुष्यात अनेक संशोधन करून अवकाश  क्षेत्रात त्यांनी केलेली कामगिरी अतुलनीय आहे. त्यांच्या कर्तुत्वाच्या आधारावर त्यांना "मिसाईल मैन" म्हणून ओळखल्या जाते. अश्या या अभ्यासू जिद्दी व्यक्तिमत्वाचा जन्मदिन "वाचन प्रेरणा दिन"  म्हणून २०१५ पासून साजरा केला जातो. विविध शाळा, महाविद्यालये, वाचनालये आणि ग्रंथालये या ठिकाणी अनेक वाचानाधारित उपक्रमांचे आयोजन केले जाते. इतर नेत्यांच्या पुण्यतिथीला ,जयंतीला फक्त भाषण आणि संभाषणावर जोर धरणाऱ्या नेत्यांना मात्र आजच्या दिनी का होईना एखादे पुस्तक वाचनाचा योग येत असेल हे त्याचं सौभाग्याच म्हणावं लागेल.
  
डॉ. कलाम यांनी  ‘इंडिया 2020’ या 1996 मध्ये लिहिलेल्या पुस्तकात आपला भारत हा कृषी, विज्ञान, शास्त्र, तंत्रज्ञान यासह विविध क्षेत्रात 2020 पर्यंत जगात आघाडीवर असावा, अशी संकल्पना मांडली होती. या पुस्तकाद्वारे त्यांनी देशातल्या विद्यार्थी आणि युवकांना देशाच्या विकासाची आणि रचनात्मक कार्याची स्वप्ने पहा, मोठे व्हा, राष्ट्राला तुमच्या समर्पणाची गरज आहे, असे आवाहन केले होते. डॉ. कलाम यांचे वाचन चौफेर होते. ते इंग्रजी भाषेत लिहीत आणि बोलत. विद्यार्थ्यांना त्यांचे विचार समजत आणि त्या विचाराने विद्यार्थी पेटून ऊठत असत. पंतप्रधानांच्या तांत्रिक सल्लागारपदावर असताना, त्यानंतर आणि राष्ट्रपती झाल्यावर, ते पद सोडल्यावरही डॉ. कलाम यांचे जनजागरणाचे आणि युवाशक्तीला प्रेरित करायचे कार्य अखंडपणे सुरू होते. आठ दहा वर्षे वयाच्या शालेय मुलांच्याबरोबरही ते अत्यंत सहजपणे बोलत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशीही मनमोकळी चर्चा करत. त्यांचा सहवास आणि भाषण ऐकणे हे विद्यार्थ्यांना पर्वणी वाटत असे.  ‘अग्निपंख’ या त्यांच्या आत्मचरित्राचा सर्व भारतीय भाषात अनुवाद झाला. हे पुस्तक विद्यार्थ्यांना आणि युवकांना नवी स्फूर्ती देणारे ठरले आहे. अशा या वाचन प्रिय आणि प्रेरणादायी नेत्याच्या जयंती दिनी राज्यातल्या सर्व शाळात कृतिशीलपणे म्हणजेच सर्व विद्यार्थ्यांना वाचनाच्या प्रक्रियेत सध्या सहभागी करून घेतले जात आहे हि अतिशय अभिमानाची बाब म्हणावी लागेल.


     'वाचाल तर वाचाल' हे मर्मवाक्य  अगदी बालपणापासूनच कानपाठ झालेलं असेल,पण नेमकं आपण खरच वाचन करतो का? आणि वाचन करण्याची सवय आपल्याला आहे का? तशी संधी आपल्याला मिळते का ? याचं चिंतन प्रत्येक साक्षर व्यक्तीने करणे अपेक्षित आहे. सध्याच्या या इलेक्ट्रोनिक युगात अनेक प्रसारमाध्यमांचा झपाट्याने प्रसार होताना दिसतोय, प्रत्येक घरात टीवी,इंटरनेट तसेच प्रत्येक हातात मोबाईल सर्रास दृष्टीस पडतोय. यामधून वेळ काढून वाचन करणारे वाचक दुर्मिळच. एकदा का हातातील भ्रमणध्वनी ऊघडला की कित्येक तास त्यावर घालणारे महाभाग पुस्तक वाचा म्हटलं की तोंड पाडतात. तसंही थोडक्या वेळातील व्हिडीओ  बघून त्यावरून बरच काही शिकवणारे टिकटोक सारखी अप्प्स मोबाईल वर उपलब्ध करून देण्याची स्पर्धाच सध्या इलेक्ट्रोनिक माध्यमांत दिसून येत आहे. तरीसुद्धा पुस्तकातून मिळणारे लेखकाचे विचार,त्याची भाषाशैली, लेखकाची समरसता या गोष्टीला मात्र पर्याय मिळूच शकत नाही हे वाचकांनाच पटेल.
    खेळणाऱ्या, मोबाईल ,टीवी पाहणाऱ्या मुलांना "चला रे बस करा आता,घ्या पुस्तक आणि करा अभ्यास" असे म्हणणारे पालक आपल्या पाल्यांदेखत कधी पुस्तक वाचत बसतात का? हा विचार पालकांनी करावा. एका घरात जेव्हा पालक, आई ,आजोबा पुस्तक,वर्तमानपत्र वाचतांना लहान मुलाला दिसते;त्यावेळी ते अज्ञानी बालक सुद्धा आपल्या हातात काहीतरी धरून वाचत असल्याचा आव आणतांना दृष्टीस पडते. याचा अर्थ थोरामोठ्यांनी अगोदर करावे आणि मग फक्त पहावे.. कदाचित त्यांना सांगण्याची गरजच पडनार नाही. प्रत्यक व्यक्तीने आपल्या पाल्यांना आवडत्या विषयाचा अभ्यास करून त्यावर आधारित पुस्तके जर घरात उपलब्ध करून दिली तर नक्कीच पाल्य त्याचे वाचन करेल. खेळ, चित्रपट,पाककला, शेती,विज्ञान,तंत्रज्ञान, आध्यात्म आणि एकंदरीत सगळ्याच विषयाची पुस्तकं बाजारात उपलब्ध आहेत. याचा पुरेपूर वापर करत लग्नसमारंभ,वाढदिवस, भेटीगाठी या कार्यक्रमांत आवर्जून एखादे पुस्तक भेट म्हणून देण्याचा पायंडा पाडवा.
   याच्याही पुढे जाऊन संगणकावर उपलब्ध असणाऱ्या पुस्तकांच्या वेबसाईट आवर्जून पाल्यांच्या निदर्शनास आणून द्याव्यात. वाचनात वाचकाच्या आवडीप्रमाणे अनेक प्रकारचे साहित्य उपलब्ध आहेत परंतु ते त्यांना उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. वाचतांना मात्र आपले योग्य विचाराचे असल्याचे वाचकाने आपल्या सद्सद्विवेक बुद्धीने ठरविणे गरजेचे आहे अन्यथा सध्यस्थितीत अनेक कुविचारी, अश्लील, अराजक  साहित्य सुद्धा बाजारात उपलब्ध आहेत.
              "पुस्तकाचे गाव भिलार' या गावाची संकल्पना प्रत्यक गावात समजुतीने रुजविण्याचा प्रयत्न व्हावा.   ग्रामपंचायतीने आपल्या गावत आदर्श वाचनालय,ग्रंथालय निर्माण करून त्यामध्ये  गावातील शेतकऱ्यांसाठी कृषी,मत्स्य,कुकुटपालन, विविध लघुउद्योग यावर आधारित  साप्ताहिके,मासिके  उपलब्ध करून द्यावीत. महिलांसाठी पाककला, क्रांतिकारी महिलांची जीवन चरित्र , पारंपारिक गीते,लोककला जोपासणारी पुस्तके येथे उपलब्ध व्हावी,याशिवाय विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा, शोध निबंध,विविध प्रयोग,खेळ यावर आधारित पुस्तके तर  अनेक कथा, कादंबऱ्या ,प्रवासवर्णने ,नाटके खेड्यातील वाचकांना उपलब्ध करून दिल्यास नक्कीच वाचकांची संख्या वाढून वाचन संस्कृतीचे पुनरुज्जीवन व्हायला सुरवात होईल.

वाचनामुळे  विद्यार्थ्यांच्या विचाराला चालना मिळते, नवनवीन शब्दांमुळे त्याच्यात प्रगती होत असते. वाचनामुळे आपल्याला नवनवीन माहीती मिळतेच तसेच ज्ञानात भर पडते. वाचनाने शब्द संपत्ती वाढते. त्याचा उपयोग विद्यार्थ्यांना निबंध, वकृत्व, लेखन यामध्ये करू शकतो. लेखकांच्या कथा, कादंबरी, ललितलेख, कविता या विषयी माहिती मिळते. आपले सामान्य ज्ञान वाढते. त्याचा उपयोग त्याला भावी जीवनात होऊ शकतो.

आपल्याला जर वाचनाची आवड असेल तर मित्रमंडळी किंवा लोकांमध्ये वावरताना आपण एखाद्या विषयावरील चर्चेत आपले मुद्दे योग्य प्रकारे मांडू शकतो. त्यामुळे त्यांच्यात मिसळण्यात मदत होते. वाचनामुळे आपण आपली मते ठळकपणे मांडू शकतो.


           शिक्षक,आई वडील,घरातील मोठी माणसे यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन योग्य पुस्तके वाचली पाहिजेत.वाढदिवस दणक्यात साजरा करण्याऐवजी वाढदिवसाला छान छान पुस्तके वाटली पाहिजेत.दिवाळीला फटाके वाजवण्याऐवजी दिवाळी अंक विकत घेऊन वाचले पाहिजेत.गाव तेथे ग्रंथालय ही लोकचळवळ झाली पाहिजे.आपण स्वतः पुस्तक वाचले पाहिजे व इतरांनाही वाचण्यास प्रोत्साहित केले पाहिजे तरच वाचनसंस्कृती जपता येईल.

  वाचनातून माणूस विचार संपन्न होण्यास मदत होते, वाचण्याने जगातील विचार समजून घेऊन आपल्या जीवनक्रमात त्याचे प्रतिबिंब दिसून येते.शरीराला जशी अन्नाची गरज यशाचं मनाला विचारांची गरज असते आणि हे विचार नक्कीच चांगल्या वाचनातून मिळवता येतात. वाचनाने मनाची भूक पूर्ण होते  आणि वाढते सुद्धा! एकदा वाचनाची सवय जडली तर सतत वृद्धिंगत होत जाते आणि मग  चांगल्या वाचनातून माणूस घडायला वेळ लागत नाही. शेवटी वाचाल तर वाचाल!!!!!!!

 लेखन- श्री.ज्ञानेश्वर झगरे गुरुजी.
              (शिक्षक)

Saturday, October 12, 2019

माझ्या शाळेचे स्नेहसंमेलन


                  “अहो गुरुजी, माह्या शुभ्यालं दिट (दृष्ट) झालीनं बाप्पा!, रातच्या शाळामधल्या कार्यक्रमात नाटक केल्यानं! लय भारी पोऱ्हं बोलायला लागलेत कि आता आपल्या शाळातले!” असं शुभम जगधने ची आजी सकाळी सकाळी शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन मला म्हणाली.त्यावेळी  तिथं  उभे असलेले अनेक पालक ,गावकरी रात्री झालेल्या स्नेहसंमेलन कार्यक्रमांच तोंडभरून कौतुक करत होते. रात्री कार्यक्रम संपायला बराच वेळ लागला होता त्यामुळं नक्कीच आज कमी  विद्यार्थी शाळेत येतील असं मला वाटलं होतं, परंतु तो माझा अंदाज खोटा ठरवून आज जेमतेम सगळीच मुल शाळेत आलेली नजरेस पडली! प्रार्थना घेतांना मुलांच्या चेहऱ्यावरील त्यांनी चांगली कामगिरी पार पाडल्याचा अभिमानी आनंद पाहून माझं उर सुद्धा भरून येत होतं.  ‘मुलांमध्ये किती सुप्त गुण असतात आणि त्यांना संधी दिली तर ते किती निर्भीडपणे आणि अनाकलनीय व्यक्त होतात!’ याची जाणीव मला या सम्मेलनाने करून दिली होती. शाळेसाठी भरपूर मदत निधी एका रात्रीत गोळा झाला होता, शिक्षक आपल्या मुलांना किती जवळीकतेने स्वीकारतात याची जाणीव पालकांना झाली होती. शाळेविषयी अभिमानाचे शब्द कितीतरी पालकांच्या आणि गावातील प्रतीष्ठीतांच्या  तोंडून ऐकायला येत होते. आजपर्यंत सतत शाळेसाठी धडपडणारे आम्ही  शिक्षक पण आजपासून लोकांच्या नजरेतून पास झालो होतो...! निमित्त होते स्नेहसंमेलन “किलबिलाट” कार्यक्रमाचे.             आपल्या शाळेतील विद्यार्थी , शिक्षक आणि गावकरी यांचा त्रिवेणी संगम घडवून आणण्यासाठी ‘स्नेह्संमेलन’ हि एक महत्वाची पर्वणी आहे असे मला वाटते . वर्षभर आपण विद्यार्थ्यांसाठी ‘काय करतो’ याची चमक आणि चुणूक  दाखवण्याचा व शाळेविषयी समाजाच्या मनात जागा निर्माण करण्याचा या सुंदर ‘दुग्धशर्करा योग’. ‘आपल्या विद्यार्थ्यांमध्ये असलेले अनेक सुप्त गुण बाहेर काढून त्यांना समाजासमोर मांडून त्यांचा आत्मविश्वास वाढवून भावी नागरिक बनविण्यासाठी हा एक मैलाचा दगड मानावा असे मला वाटते!’ त्यासाठी शिक्षकांनी मात्र मनाची तय्यारी ठेवायला हवी.स्नेहसंमेलन तयारी म्हणजे जेमतेम एक महिना अवधीचा हा उपक्रम. अगदी शाळा व्यवस्थापन समितीची बैठक घेऊन, पालक मेळावा घेऊन शिक्षकांना जबाबदाऱ्या वाटप करून शाळेच्या नोटीस बोर्डवर सूचना लावून स्नेहसंमेलनाचा श्रीगणेशा करायचा. विद्यार्थ्यांना स्नेहस्म्मेलनात कोणकोणते इव्हेंट घ्यायचे आहे याची जाणीव देऊन त्यांच्याकडून त्यांच्या आवडीनुसार त्यांना कोणत्यातरी घटकात भाग घ्यायला लावणे म्हणजे शिक्षकाच्या यशाचं पाहिलं पाउल ठरतं!  शंभर टक्के मुलांना सहभागी करणे हे एक आव्हान असतं. यातील काही विद्यार्थ्यांना नृत्य तर काहींना नाट्य आवडेल. यामध्ये गायन,वादन,भाषण,संभाषण,मुकाभिनय,एकपात्री नाटक, संगीत ड्रामा असे वेगवेगळे इव्हेंट असायचे. काही विद्यार्थ्यांना वरीलपैकी काहीच करण्याची इच्छा नसली तरी त्यांना निदान एखाद्या नाटिकेत किंवा समूहनृत्यात सहभाग घ्यायला लावणं हि एक आमची हातोटीच झाली होती.                    पारंपारिक लोकनृत्ये,ग्रामीण जीवनाचे पैलू उलगडणारे विविध गीते, रंगदेवता प्रसन्नतेसाठी संतांचे अभंग किंवा गवळण घेणे आणि समाजिक प्रबोधनावर प्रकाश टाकण्यासाठी एकांकिका ठरविणे हे सुद्धा एक अफलातूनच असायचं. स्त्रीशक्ती जागर, व्यसनमुक्ती ,हुंडाबळी ,पर्यावरण संवर्धन,सामाजिक एकता यांसारख्या बाबींवर प्रकाश टाकणे आमचा हातखंडा असायचा. कधीकधी विनोदी तर कधीकधी भावनाप्रधान प्रसंग बनविणे यासाठी सरावाने खूप प्रयत्न करावे लागायचे. शेवटी देशाभिमान जागृत व्हावा या हेतूने मुद्द्दाम क्रांतिकारक आणि देशाचे सैनिक यांच्या जीवनदर्शनासाठी मुद्दाम ड्रामा बनवून राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रभक्ती वाढविण्यासाठी प्रयत्न असायचा.यासाठी मुद्दामहून आपल्या शाळेचा माजी विद्यार्थी किंवा शेजारील गावातील एखादा फौजी जवान बोलावून त्याचा सत्कार स्टेजवर करून घेणे मला आवडायचे.               ‘स्नेहसंमेलनातून सामाजिक जाणीव निर्माण करण्याबरोबरच विद्यार्थी कौशल्य वाढविणे आणि शाळेप्रती समाजाची आस्था वाढविणे हा ‘सुवर्णकांचन योगचं!’ म्हणावा लागेल.’             स्नेहसंमेलनाच्या  तयारीला अगोदरच आम्हा सर्व शिक्षकांवर जबाबदाऱ्या दिलेल्या असायच्या. यामध्ये कार्यक्रमा अगोदर, कार्यक्रम चालू असतांना आणि कार्यक्रम आटोपल्यावर करावयाचे नियोजन केले जायचे. संमेलना अगोदर  इव्हेंट निवडणे, त्याची तय्य्यारी सराव घेणे, वेशभूषा ठरवून प्राप्त करणे, स्वागत गीत निएद्न सराव घेणे, सूत्रसंचालनाची जबाबदारी एक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांच्यावर सोपवून विद्यार्थ्यांची रंगीत तालीम घेणे वगैरे नियोजन असायचे .तसेच प्रमुख पाहुणे ठरविणे त्यांना निमंत्रण पत्रिका पाठविणे. वर्षभरातील विद्यर्थ्यांनी मिळवलेल्या यशाचे कौतुक करण्यासाठी बक्षिस म्हणून प्रमाणपत्र आणि पदकं बनवून घेणे, पिण्याचे पाणी ,रंगमंच व्यवस्था, ध्वनी व प्रकाश व्यवस्था ,स्वागत कमान, रांगोळी रेखाटने, प्रेक्षकांची बैठक व्यवस्था करणे.  वेगवेगळ्या ठिकाणी गरजेनुसार स्वयंसेवक नेमणूक करणे, त्यांना आकर्षक ब्याच देणे.अशी सगळी कामे नियोजित केलेली असायची. कार्यक्रम पूर्ण झाल्यावर साहित्याची सुव्यस्था करणे, आभार मानणे, जमाखर्चाचा हिशोब अहि जबाबदारी आम्हा शिक्षकांवर सोपवून दिलेली असायची. गरज पडेल तिथे शाळा व्यवस्थापन समितीची मदत घ्यायची ठरलेले असायचे.कार्यामाच्या दिवशी बैठक व्यवस्था झालेली आहे आणि प्रेक्षक आलेले आहे हे पाहून अगदी वेळेवरच कार्यक्रमाचे उद्घाटन करायचे या कार्यक्रमासाठी मुद्दामहून एखादा बालसाहित्यिक , ज्यांना बघून आपोआप ग्रामीण प्रेक्षक स्वयंशिस्त बाळगतील यासाठी पोलीस विभागातील एखादा अधिकारी, शाळेचा एखादा विशेष माजी विद्यार्थी, मुद्दामहून शाळा व्यवस्थापन समितीने ठरविलेला दानशूर व्यक्ती जो नक्कीच सर्वांसमोर शाळेला मदत करून समाजाला प्रेरित करेल यासाठी, शिक्षण विभागातील उपलब्धतेनुसार मान्यवर या कार्यक्रमाला बोलावयाचे आणि हो या कार्यक्रमाला राजकीय स्वरूप येणार नाही यांची मात्र आवर्जून दक्षता घेतलेली असायची. उद्घाटनप्रसंगी शिक्षकानेच संचालन करून यावेळी वर्षभरातील शाळेचा प्रगती आलेख मान्यवर आणि समाजासमोर थोडक्यात ठेवून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून घ्यायचा. “शाळेला गावाचा आधार आसावा आणि गावाला शाळेचा अभिमान आसावा”. यानुसार समाजासमोर शाळा मांडून त्यांना त्याची जाणीव करून द्यायची. नंतर एखाद्या मान्यवरांचे मनोगत घेऊन पाहुण्यांना बैठकीत स्थानापन्न करून, मुख्य कार्यक्रम सुरु व्हायचा. या कार्याक्रमचे सूत्रसंचालन मुद्दाम तय्यारी करवून घेतलेल्या विद्यार्थ्याना करायला लावायचे.               लहान मुलांचे ठेक्यावर पडणारी पाउले आणि बोबड्या भाषेत केलेले अनमोल संवाद नक्कीच प्रेक्षकांच्या ह्रदयाचा ठाव घेणार हे नक्कीच मनात कोरलेलं सत्यात उतरायचं .भरभरून मिळणारा  टाळ्यांचा कडकडाट,विद्यार्थ्यांचे हृदयाला पाझर फोडणारे संवाद, त्यांच्यातील आत्मविश्वास  आणि मिळालेल्या बक्षिस रकमेची यादी स्नेहसंमेलन यशस्वीपणे होत असल्याची नांदीच वाटायची........!लेखन- ज्ञानेश्वर गणपत झगरेस.शिक्षक , जि.प.प्रा.शाळा,उमरखेडा. ता-भोकरदन, जि-जालनामो.नं. ९९२३५२८४९४    x

माझी स्नेह्संमेलनाची आठवण


स्नेह्संमेलनाची आठवण
          “अरे बाळा तुला नाचायला आवडते ना ? तर मग मी तुला वर्गात नाचायला शिकवतो आणि तुझी बहिण मनुताई नव्हती नाचली का मागच्या वर्षी स्टेजवर ! हं,तर तुला मी तसचं नाचायला देईन”  असं म्हणून मी माझ्या पहिलीच्या वर्गातील अनेक मुलांना सुरवातीलाच वर्गात कायम बसायला प्रवृत्त करायचो आणि मग माझ्या बहुवर्ग अध्यापनातील याच खोलीमध्ये बसलेला दुसरा वर्ग मोठ्या आशेनं “यावर्षीसुद्धा स्नेहसंमेलन होणार न सर !” असं म्हणून त्यांच्या चेहऱ्यावरील कमालीचा आनंद व्यक्त करायचा. याचा अर्थ स्नेहसंमेलन म्हणजे मुलांना आपल्यातील विविध कलागुणांना व्यक्त करण्याची संधी. प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये कोणतातरी कलागुण असल्याची जाणीव मला माझ्या सेवेच्या काळात कळाली आणि मग अशी विद्यार्थी विकासाची हि संधी मी कधीच सोडू इच्छिली नाही. यातून दरवर्षी शाळेमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित केले जायचे .
           आमच्या शाळेतील स्नेहसंमेलनाची डंका निदान एक महिना अगोदरच वाजायची आणि हो मुलांनी तर त्यासाठी मात्र अगदी शाळा सुरु झाल्यापासूनच तयारीला लागल्याचं दृष्टीस पडायचं. स्नेहसंमेलनाची नोटीस म्हणजे शाळेतल्या मुलांना उन्हाळ्यातली गारीगार खाल्ल्यागत आनंद व्हायचा. सुरवात आम्हा शिक्षकांची आणि शाळा व्यवस्थापन समितीची लगेच संयुक्त बैठक व्हायची आणि या बैठकीत खर्चाचे नियोजन करून आम्हा सर्व शिक्षकांवर जबाबदारी सोपवली जायची. अगोदरचे नियोजन म्हणजे एका शिक्षकाने विद्यार्थ्यांची त्यांना आवडणाऱ्या कलेची तोंडी किंवा लेखी  चाचणी घेऊन त्यामधून कोणत्या विद्यार्थ्याला कशात भाग घ्यायला आवडेल हे ठरविणे. या चाचणीतून त्यांनी नृत्य, नाटक, मुकाभिनय, गायन,वादन, भाषण, मनोरे,संचालन असे पैलू निवडायचे. ज्या विद्यार्थ्याना काहीच आवडत नसेल तर त्यांना आग्रहाने एखादा घटक निवडायला सांगुन त्याची तय्यारी करण्याची जबाबदारी घ्यायची. प्रमख पाहुणे ठरविणे, बाईंनी स्वागत गीत तयारी करून घेणे. कुणी नाटिका तालीम घेणे, रंगमंच जबबदारी, स्वयंसेवक नेमणे, गाणे पेन ड्राईव्ह मध्ये भरणे, वेशभूषा ठरवून उपलब्ध करणे, स्वागतासाठी नवीन रोपटे बनविणे किंवा विकत आणणे,लेझीम पथक सराव, मनोरे बसविणे,सूत्र संचालन ठरून देणे,रंगमंच आणि सजावट ठरविणे,फोटोग्राफी आणि शूटिंग व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था,आर्थिक निओजन आणि व्यवस्थापन करणे, शेवटी चार पाच दिवसाअगोदर सराव आणि रंगीत तालीम घेणे असा नियोजनबद्ध कार्यक्रम आखला जायचा.,दोन दिवस चालणाऱ्या स्नेह संमेलन या कार्यक्रमाचे नियोजन पुधिल्प्रमाअने केले जायचे.
दिवस पहिला-
 स्नेहसंमेलन कार्यक्रमात पहिल्या  दिवशी लेझीम पथकाने सन्मानपूर्वक आणलेल्या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते यावेळी आवर्जून ठेवलेले रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन करून गावकऱ्यांसाठी खुले करून दिले जायचे. चित्रकला , हस्तकला प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा याच दिवशी मान्यवरांच्या हस्ते करून घ्यायचा  आणि पूर्ण वर्षभरात घेतलेल्या विविध स्पर्धा, मैदानी खेळ, आणि इतर उपक्रम यामध्ये प्रविण्याने विजयी झालेल्या मुलांचा सत्कार करून घेऊन त्यांना अभ्यासोपयोगी वस्तू बक्षिस म्हणून द्यायच्या.
दिवस दुसरा-
 सर्व विद्यार्थ्यांनी आज स्टेजवर सादर करावयाच्या  इव्हेन्टची पूर्ण पूर्वतयारी  करून आपापला सरांनी किरायाने आणलेला पोशाख अगोदरच्या दिवशी मिळाल्याप्रमाणे आपली वेशभूषा करून वेळेवर सजावट वर्गात तय्यार रहायचे. या सजावट खोलीमध्ये नियोजित शिक्षक किंवा स्वयंसेवक नेमलेला असेल,तिथे त्या स्वयंसेवकाने पिण्याचे पाणी, आरसा, कंगवा, मेकअप चे सामान अगोदरच नेऊन ठेवलेले असायचे. या दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमासाठी सुद्धा प्रमुख अतिथी बोलावले जायचे; ज्यामध्ये प्रामुख्याने कला , बाल साहित्यिक किंवा शिक्षण विभागातील प्रमुख असायचे. सोबतच शाळेचा एखादा माजी विद्यार्थी जो फौजी ,डॉक्टर, शिक्षक , समाजसेवक किंवा विशेष कार्यात असेल असा विद्यार्थी असायचा. नियोजित विद्यार्थी आपल्या लेझीम पथकासोबत पाहुण्यांचे स्वागत करून त्यांना रंगमंचाकडे आणतील आणि मग दुसरे शिक्षक पाहुण्यांना स्थानापन्न करून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतील असे आमचे नियोजन असायचे. यासाठी विद्यार्थ्यांनी गायलेल्या स्वागतगीतानंतर  अगोदरच तयार करून ठेवलेले झाडाचे रोपटे आणि शाल पाहुण्यांना स्वागतपर दिली जायची. यावेळी पाहुन्यांनी गावकरी आणि प्रेक्षक यांना मार्गदर्शन करून औपचारिक उद्घाटन कार्यक्रम व्हायचा आणि पाहुणे त्यांच्यासाठी असलेल्या विशेष आसनांवर स्थानापन्न व्हायचे. यानंतर बालचमुंचा “किलबिलाट” हा कार्यक्रम सुरु व्हायचा. या कार्यक्रमामचे सूत्रसंचालन अगोदर नियोजित केलेला एक विद्यार्थी आणि एक विद्यार्थींनी अगदी हुबेहूब जोडीजोडीने विनोदी संवादातून विशिष्ट संदेश देऊन करायाचे  आणि मग यांनाच कुणाची नजर लागेल कि काय असे आम्हाला वाटायचे. यावेळी  विद्यार्थी प्रार्थना, भक्तिगीते, पारंपारिक लोकगीते यांचे उत्कृष्ट सादरीकरण करायचे. प्रबोधनपर विविध एकांकिका यावेळी विद्यार्थी सादर करायचे. यामध्ये शिक्षण, स्त्रीभूर्णहत्त्या, हुंडाबळी, व्यसनमुक्ती, वृक्षलागवड आणि पर्यावरण , देशभक्ती, एकात्मता ,समाजातील अनिष्ट प्रथा अश्या विविध ज्वलंत घटकांवर बसवलेले नाट्य आसायचे. अश्या नाटिका बघून प्रेक्षकांना खदखदून हसतांना आणि कधी कधी हुंदके भरून अश्रू गाळताना नजरेत भरायचे. आपसूकच अनेकांचे हात खिशात जायचे आणि या लेकरांच्या कलेसाठी मदत जाहीर व्हायची यातून शाळेसाठी काहीतरी पयोगी वस्तू खरेदी केली जायची.
तब्बल तीन चार तास चालणाऱ्या या कार्यक्रमाचा शेवट देशभक्तीपर ड्रामा घेऊन आणि शेवटी “वंदे मातरम्” करून केला जायचा; ज्यामुळे देशभक्तीचे वातावरण तयार व्हायचे. असा हा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम आम्हाला आणि विद्यार्थ्यांना खूप काही शिकवून जायचा आणि आता पुढील वर्षी हा कार्यक्रम केंव्हा येईल? अशीच ओढ लागलेली असायची....

लेखन- ज्ञानेश्वर गणपत झगरे
स.शिक्षक जि.प.प्रा.शाळा उमरखेडा, ता-भोकरदन, जि-जालना
मो.नं.-९९२३५२८४९४.     

Friday, October 11, 2019


आजच्या दैनिक एकमत मधील #सप्तरंग_पुरवणी मध्ये 'आशेचं बेट'या सदरात श्री संतोष मुसळे यांनी माझ्याविषयी लिहलेला लेख....#ज्ञानपंढरी_उभारताना..


ज्ञानपंढरी उभारताना
आषाढ महिना सुरु झाला की,वारकऱ्यांना वेध लागतात ते पंढरीचे.मात्र विद्यार्थी हाच आपला पांडुरंग आणि नौकरीचे गाव हेच पंढरपूर ही खुणगाठ मनाशी घट्ट बांधून मागील दहा वर्षांपासून वारकरी संप्रदायाचा आधार घेत गावात ज्ञानपंढरी उभारणारे ज्ञानेश्वर झगरे हे जालना जिल्ह्यातील एक उपक्रमशिल शिक्षक आहेत.
     शैक्षणिक उपक्रमांचा जिल्हा म्हणून जालना जिल्हाची ओळख सर्वत्र आहे.याच जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्यातील घाणखेडा नावाचे छोटेसे गाव आहे. गावाच्या नावावरुन आपण अचंबित व्हाल मात्र
पूर्वीच्या काळी तेलाचे घाणे होते, यामुळे खुप घाण व्हायची म्हणून घाणखेडा नाव पडले.
     स्वतः वारकरी कीर्तनकार असलेले आणि उत्तम कथाकार असलेले श ज्ञानेश्वर गणपत झगरे सर यांनी खऱ्या अर्थाने  या शाळेच्या विकासाची मुहूर्तमेढ १० वर्षांपूर्वी रोवली आणि अविरतपणे ही शाळा सतत प्रगतीचा आलेख उंचावत आहे.
   ज्ञानेश्वर झगरे यांचा जन्म बुलडाणा जिल्ह्यातील माँ जिजाऊंचे जन्मस्थान असलेल्या सिंदखेडराजा तालुक्यातील वाकद(जहागीर)या खेडेगावात झाला. प्राथमिक शिक्षण गावातील जि प शाळेत घेऊन त्यांनी देऊळगाव राजा येथील नामांकित देऊळगाव राजा हायस्कूल मध्ये माध्यमिक शिक्षणाला सुरवात केली, आणि इयत्ता दहावीत असतांना  त्यांच्या वडिलांचे निधन झाले.  कौटुंबिक हालअपेष्टा असतांना सुद्धा आई कुशावर्ता  आणि किराणा दुकान चालवणारे भाऊ विठ्ठल झगरे यांच्या मदतीने त्यांनी आपले शिक्षण पूर्ण करून डी एड सीईटी मध्ये गुणवत्ता यादीत येऊन घाणखेडा या गावी त्यांची प्रथम नियुक्ती झाली.
"नसे राऊळी वा नसे मंदिरी।
जिथे राबती हात तेथे माझा हरी"।
   या उक्तीप्रमाणे त्यांनी या घाणखेडा येथील शाळेला मंदिर मानून तेथील विद्यार्थ्यांना देवता समजत या  विद्यमंदिराचा विकास करण्याचे ठरविले आणि आज तो त्यांचा प्रयत्न यशस्वी झाल्याचं दिसतंय.शाळेच्या मैदानावर गावातील नागरिकांनी अतिक्रमण करून तिथे गुर, बकऱ्या बांधणे. इमारतीचा लग्न कार्यासाठी वापर होत होता,स्वछता नव्हती.मैदानात ओसाडपणा होता.पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती.... जुन्या पद्धतीचे  शिक्षण होते.खेळ, संगीत, गायन वादन , वेशभूषा , नाटय, लेझीम, डुंबेल्स , विविध कवायती भाषण, इंग्रजी शिक्षणाची आवड नव्हती.
      घाणखेडा हे गाव तसं शैक्षणिक दृष्टीने मागासलेले असले तरी येथील माणसांमध्ये असलेली माणुसकी आणि मानवता जाणून झगरे सरांनी  गावकऱ्यांना
शाळेच्या विकासासाठी सहभागी करण्याचे ठरविले.
सर्वप्रथम आपला स्वतः वर्ग त्यांनी प्रगत करण्याचे ठरविले, त्यासाठी स्वतः शैक्षणिक साहित्य तय्यार करून, हसत खेळत आनंददायी शिक्षण देत त्यांनी आपला वर्ग पूर्ण प्रगत केला,मैदानावर कृतीगीते, लेझीम, डंबेल्स वाजायला लागल्याने गावकरी आणि पालक यांचे लक्ष शाळेकडे वेधण्यात सर यशस्वी झाले.

Sunday, October 6, 2019

माझ्याविषयी

             मी एक जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक. तसा साहित्याची आवड असलेलाच मी, अगदी बालपणापासून नाटक पाहणे,सिनेमा पाहून जसाच्या तसा इतरांना कथन करणे या माझ्या घडामोडी असायच्या. अगदी पाचवीमध्ये शिकत असतांना स्वतःच चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकावरून राजा शिवछत्रपती हे अगदी तीन तास चालणार नाटक मी स्वतःच लिहून माझ्या वर्गमित्रांच्या सहाय्याने आमच्या गावात यशस्वी प्रयोग सादर केला होता याचं मला आजही नवलच वाटत.
     आता सध्या कीर्तन करून संत विचाराच्या आधारे समाजप्रबोधन करणे  आणि अनिष्ट बाबींना  आळा  घालण्याचा प्रयत्न सुरु आहे. आणखी माझा आवडता छंद म्हणजे कथाकथन करणे आहे, कोणतीतरी एखादे कथानक बनवून त्यावर आधारित कथा सांगायला मला फार आवडते परंतु तसा योग दुर्मिळच . साने गुरुजी कथामालेच माध्यमातून जिल्हास्तर आणि विभागस्तरावर कथाकथन करण्याचा सुयोग प्राप्त झाला. शिक्षकांच्या साहित्य संमेलनात मिळालेल्या संधीचे सोने करतांना मी कसून प्रयत्न केला आणि तसा तो यशस्वी सुद्धा झाला.
          या सगळ्या गोष्टीपेंक्षा माझा आवडता विषय म्हणजे "माझा विद्यार्थी-माझे दैवत" आणि म्हणून  नवनवीन उपक्रम करण्याची माझी धडपड सतत सुरूच राहते,यातून मला उपक्रमशील शिक्षक म्हणतात हा माझ्यासाठी आनंददायीच म्हणावं लागेल.  आता ब्लॉगवर  इथून पुढे काही तरी टायपून ठेवण्याचा प्रयत्न करीन म्हणतोय..... बघूया किती यशस्वी होता येईल ते..... शेवटी सखा भगवंत ..कृपा त्याची...!  

शिव संवाद.- फेसबुक वरील लाईव्ह कार्यक्रम 'मन करा रे प्रसन्न'

https://m.facebook.com/story.php?story_fbid=177296593607156&id=100977544953592